पालखी सोहळा २०२५
म.ए.सो.बाल विकास मंदिर शाळेचा आषाढी वारी निमित्त दरवर्षीप्रमाणे पालखी सोहळा साजरा करण्यात आला.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शाळेमध्ये पालखी सोहळा घेण्यात आला. यामध्ये चौथीच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी आयोजित केली होती. शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री.बडधे सर यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. दोन विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी च्या पोशाखामध्ये आले होते. या कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व शाळेतील सर्व शिक्षक वृंद तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. शाळेतील इतर विद्यार्थी वारकरी पोशाखात सहभागी झाले. तसेच इ.४थी च्या विद्यार्थ्यांनी विठ्ठलाची गाणी आणि भजन सादर केले.



गुरुपौर्णिमा
म.ए.सो. बालविकास शाळेमध्ये वार गुरुवार दिनांक १०/०७/२०२५ रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गुरु विषयी माहिती आणि गोष्टी सांगितल्या. तसेच विद्यार्थ्यांनी गुरुपूजन केले. औक्षण करून गुरूना भेटवस्तू दिल्या.

दीपपूजन
म.ए.सो.बाल विकास मंदिर शाळेमध्ये वार गुरुवार दिनांक २४/०७/२०२५ आषाढी अमावस्या निमित्त दीपपूजन करण्यात आले. यामध्ये इ.१ली ते ४थी च्या विद्यार्थ्यांनी सर्व प्रकारचे दिवे आणले. विद्यार्थ्यांना दीपपूजनाविषयी सौ.सुरेखा जगताप यांनी माहिती सांगितली. मा.मुख्याध्यापक श्री.बडधे सर व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दीपपूजन केले.
“क्रांतिसप्ताह”
सासवड येथील बाल विकास मंदिर शाळेत क्रांतिसप्ताह
भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. मोठ्या संघर्षातून आपला भारत देश स्वतंत्र झाला. यासाठी, ९ ऑगस्ट १९४७ रोजी मोठी क्रांती झाली होती. हा दिवस इतिहासात ' ऑगस्ट क्रांती 'म्हणून प्रसिद्ध आहे. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या थोर क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे यासाठी सासवड येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत १ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट या कालावधीत ' क्रांतिसप्ताह ' आयोजित करण्यात आला होता. दररोज परिपाठाच्या वेळी विविध क्रांतिकारकांनी केलेल्या कार्याची माहिती इयत्ता तिसरी, चौथीच्या विद्यार्थ्यांनी सांगितली. यात, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, झाशीची राणी लक्ष्मीबाई, आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, भगतसिंग, सुखदेव. राजगुरू इ. क्रांतिकारकांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक, पालक यांनी मार्गदर्शन केले होते.
९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले आयुष्य पणाला लावणाऱ्या , तसेच ज्या महान व्यक्तींचे स्वातंत्र संग्रामात मोलाचे योगदान होते अशा सर्व क्रांतिकारकांच्या तसेच थोर व्यक्तींच्या प्रतिमेला मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या दिवसाचे विशेष आकर्षण म्हणजे शाळेतील विद्यार्थी भारतमाता, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , झाशीची राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, आद्यक्रांतीवर वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा उमाजी नाईक, सुभाषचंद्र बोस यांच्या वेशभूषेत आले होते. यावेळी, क्रांतिकारकांच्या वेशभूषेत आलेल्या विद्यार्थ्यांनी ' भारत माता की जय' वंदे मातरम् अशा घोषणा दिल्या.
"आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक भारतीयांनी संघर्ष केला, आपले प्राण गमावले अशा सर्व महान व्यक्तींचा आपण आदर केला पाहिजे, त्यांचे स्मरण केले पाहिजे. आपल्या देशाचा आपल्या सर्वांना अभिमान वाटला पाहिजे." असे मत मुख्याध्यापक भाऊसाहेब बडधे यांनी यावेळी व्यक्त केले. बालक्रांतिकारक शिरीषकुमार यांचे देखील उदाहरण यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिले. या क्रांतिसप्ताहाचे नियोजन माधुरी जगताप, अश्विनी कदम, राजगौरी जगताप यांनी केले होते. या विशेष अशा उपक्रमाचे शाला समितीचे अध्यक्ष ॲड. सागर नेवसे, महामात्र प्रा. सुधीर भोसले यांनी कौतुक केले.
http://themaharashtrane.blogspot.com/2025/08/blog-post_57.html

म.ए.सो.बाल विकास मंदिर शाळेत ' बाल दहीहंडी '
सासवड : येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या बाल विकास मंदिर शाळेत श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाल्याचे औचित्य साधून बाल दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी, इयत्ता पहिलीचे बाल गोपाळ राधा कृष्णाच्या वेशभूषेत आले होते. मुख्याध्यापक श्री.भाऊसाहेब बडधे यांनी हंडीचे पूजन केले. इयत्ता पहिलीच्या अवंतिका खंडाळे या विद्यार्थिनीने तसेच शिक्षिका मंजुषा चोरामले यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमी ची माहिती सांगितली. यावेळी, ' गोविंदा रे गोपाला ', 'आला रे गोविंदा आला' च्या जयघोषात शाळेचा परिसर दुमदुमून निघाला. इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहात दहीहंडी फोडली. शेवटी सर्व विद्यार्थी, शिक्षक यांना दहीकाल्याचा प्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन सांस्कृतिक प्रमुख माधुरी जगताप, राजगौरी जगताप, अश्विनी कदम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.


म.ए.सो. पूर्व प्राथमिक ( बालवाडी ) च्या विद्यार्थ्यांनी बनवले पर्यावरणपूरक गणपती मूर्ती.

